७०० वर्षांपासून अखंड अशी वारीच्या महासोहळ्याची परंपरा ह्या वर्षी लहानश्या सोहळ्याने होतेय. आषाढी एकादशीची वारी म्हणजे वारकरी पंथाचा एक अभूतपूर्व सोहळा. लाखो वारकरी पांडुरंगाच्या नामस्मरणाने पंढरीकडे पायी जातात आणि परमेश्वराचं रूप आपल्या डोळ्यांनी बघतात. जगाच्या पाठीवर हा एकमेव सोहळा आहे ज्यात एकाच वेळेस लाखो भाविक एका शिस्तीने परमेश्वराच्या भेटीसाठी पायी जातात.
युगे अठावीस विटेवरी उभा असलेला विठुराया आपल्या भक्तांची वाट मोठ्या आतुरतेने बघत असतो. शेतकरी, कष्टकरी पाऊस पडल्यांनंतर पिकाची पेरणी करून पंढरीकडे निघतो. पंढरपुरात पोहोचल्यावर जगाच्या कल्याणासाठीची विनंती करतो आणि जड अंतःकरणाने परमेश्वराचं दर्शन घेऊन परततो. ह्या सोहळ्यात पायी चालत असतांना विठोबा रखुमाईच्या नामस्मरणाने तल्लीन होऊन जाणारा मराठी माणूस वर्षभराच्या जगण्याची ऊर्जा पांडुरंगाकडून घेऊन येतो.
ह्या वर्षी हा वारकरी, शेतकरी, कष्टकरी ह्या सोहळ्यास मुकत असतांना मनोमनी परमेश्वराच्या दर्शनासाठी तळमळतोय. ह्यावर्षी त्या विठ्ठलाला कोरोनापासून मुक्त करण्यासाठी घरातूनच साकडं घालतोय. जगाला ह्या महामारीतून मुक्त करण्यासाठी घरातूनच प्रार्थना करतोय. कोरोनाच्या ह्या काळात परमेश्वराने प्रत्येकाला दर्शन दिल ते डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार आणि शेतकरी राजाच्या रूपात. संकटात जो मदतीला येतो तो देव, आणि ह्याच देवाने वेगवेगळ्या रूपात अनेकांना दर्शन दिल.
अनेक वर्षाच्या ह्या परंपरेत जगातील सर्वात मोठ्या पायी सोहळ्यात माउलींच्या पादुका लाखो वारकऱ्यांच्या सानिध्यात पंढरीकडे जातात. ह्या वर्षी ह्या वारीत फक्त मोजकेच वारकरी आणि माऊलींच्या पादुका लालपरीतून घेऊन जातांना बघून प्रत्येक मराठी माणूस कुठे तरी भावुक झाला. माऊलींच्या पादुका रस्त्यांनी सरकारी बंदोबस्तात लालपरीतून जात असतांना त्यावर भक्त रस्त्यात उभे राहून फुलांचा वर्षाव करत लांबूनच दर्शन घेतांना दिसले. लालपरी हि सामान्यांसाठी सेवा देते आणि देवही आज त्याच्यातून प्रवास करतोय. जणू परमेश्वर सामान्यांसारखाच असल्याचं दाखवून सर्वांची काळजी घेतोय.
पंढरीच्या विठुराया ह्या वारीला तुझ्या दर्शनाला मुकलेल्या वारकर्यांना पुढच्या वर्षी नेहमीसारखं दर्शनाला येऊ दे. जगावरच कोरोनाच संकट टळू दे. नेहमी सर्वांना सांभाळून घेतो तसं ह्या वेळीही सांभाळून घे..
डॉ. प्रशांत शिरोडे.