वेगळं वाटलं ना थोडं.. असंच सगळ्या देशाला आणि माझ्या मराठी माणसाला पण वेगळं वाटतंय. त्याच कारण पण तेच सत्तेसाठी भुकेले माझ्या भूमीतले राजकारणी. राजकारणाची पूर्ण गरिमा संपवून टाकली.. मी सगळ्या देशाला राजकारण शिकवलं आणि आज माझ्याच शिकवणीवर बोट ठेवला गेला...
एक महिना झाला मी माझ्या प्रदेशाचा मालक होण्याची वाट बघतोय आणि त्या मुख्य पदाला गलिच्छ राजकारणाने काळिमा फासली. विशेष म्हणजे दिल्लीच्या हुकूमशहांना माझ्यावर हुकूमुत गाजवताना बघून मला खूप दुःख झाल, ज्यांनी राजकारणाचे धडे माझ्याकडून घेतले आणि तेच आता माझं राजकारण करतायेत. आज इतकी मत माझ्याकडे उद्या तितकी मत त्याच्याकडे, आम्ही इतके फोडले त्यांनी तितके पळवले, हे सर्व बघून तर मला चीड येत होती.
शब्दाला जगणारा माझा मराठी माणूस आज दिल्लीशाहीपुढे शब्दाला बदलला आणि युती आघाडीचं राजकारण जणू मुंबईच्या समुद्रात वाहून गेल्याच वाटलं आणि काहीतरी वेगळंच वाटलं. जे घडलं ते चांगल्यासाठीच घडलं असेल असच म्हणावं लागेल, कारण ह्या सत्तेच्या खेळात राष्ट्रपती राजवट एका रात्रीत हटवून राज्यपाल भल्या पहाटे शपथविधी हि आटपून घेतात. ह्या लपवाछपवी आणि घाणरेड्या राजकारणात माझ्या अब्रूची लख्तरे टांगल्याची मला खूप जाणीव झाली. मला माझ्यातला स्वाभिमान माझ्याच लोकांकडून विकला गेल्याची मोठी जाणीव झाली. लढणारा महाराष्ट्र, लपणारा महाराष्ट्र अशी माझी चर्चा माझ्या मनाला बोचत राहिली.
मला चिंता पडली माझ्या सामान्य मतदारांची कि पुढच्या वेळेस ते मतदानासाठी कितीपत उत्सुक असतील? तो तर माझ्या मनाला मोठा प्रश्नच आहे. नवीन सरकारने माझी गरिमा सांभाळुन माझ्या मराठी माणसाची आणि खास करून शेतकऱ्याची काळजी घ्यावी हीच इच्छा... आणि "जय महाराष्ट्र" ह्या भावनेतील स्वाभिमान टिकवाल हीच सदीच्छा...
डॉ. प्रशांत शिरोडे..