आनंदाचा, चैतन्याचा, मांगल्याचा आणि उत्साहाच्या मंतरलेल्या दिवसातला शेवटचा दिवस म्हणजे "अनंत चतुर्दशी".. दहा दिवस परमेश्वर कुठलीतरी जादूच करून जातो.. महाराष्ट्राच्या भूमीवर तर स्वर्गाचं वात्सल्य दरवळत. काय जादू आहे ना ह्या सणात..! जणू परमेश्वर वर्षातील दहा दिवस भूतलावर विशेष रूपात येवून भूतलावावर आनंदाचं खिरापत वाटून जातो. जाणऱ्यावर्षी पुढच्या वर्षी लवकर येण्याची आस लावून जातो आणि येणाऱ्या वर्षी त्या दिवसाची ओढ लावून ठेवतो. हा काहीतरी भावनिक खेळ आहे आणि ती मनाची एक वेगळीच श्रद्धा आहे.. अरे हो मी गणेशोत्सवाबद्दलच बोलतोय..
आज अनंत चतुर्दशी .. दहा दिवस उत्साहाचं रोमांकित झालेलं वातावरण आज बाप्पाला थोड्या दिवसांसाठी दूर घेऊन जाणार झालय.. किती छान असतात ना गणेशउत्सवातले दिवस.. गणपती बाप्पा येणार म्हणून ती तयारीची लगबग.. बाप्पासाठी कुठलं मखर, बाप्पासाठी कुठला प्रसाद, बाप्पासाठी कुठला देखावा, बाप्पाच्या दर्शनासाठी प्रेमाच्या लोकांना आमंत्रण ह्या सगळ्याची तयारी काही वेगळीच असते. बाप्पाची आरती, बाप्पाचे रूप, बाप्पाचा प्रसाद आणि सभोतालच बदलेल वातावरण सगळं काही अलबेलच असत.. दहा दिवस वातावरणात झालेला बदल मानवी मनाला भावून जातो, कदाचित हि परमेश्वराची लिलयाच म्हणावी..
गणेशोत्सव म्हंटलं तर कोकणात त्याच विशेष महत्व आहे.. दिवाळीपेक्षा मोठ्या उत्साहाने आणि आत्मीयतेने गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या प्रसादात दिवाळीसारखा फराळ बनवला जातो. साधारणतः कोकणात चार -पाच खोलीचं घर असत. बाप्पाला दोन्ही हातात धरून घरात आणलं जात आणि सर्वात पुढच्या खोलीत पाटावर ठेवून पूजा केली जाते. नंतर बाप्पाला पूर्ण घर, जनावरांचा गोठा, शेती आणि घराचा परिसर दाखवून, गेल्या वर्षी जी आमची प्रगती झाली ती तुझ्याच कृपादृष्टीमुळे झाली असं बाप्पाला सांगितलं जात. त्यानंतर बाप्पाची आरास जिथे असते तिथे बाप्पाला ठेवलं जात आणि प्राणप्रतिष्ठा केली जाते. रोज सकाळी आणि संध्याकाळी मनोभावे आरती केली जाते. ह्या काळात बाप्पाची भजन गायली जातात. एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला बोलवलं जात. शेवटच्या दिवशी बाप्पाची पूजा झाल्यानंतर गावातील गणपती एका घरानंतर दुसरं घर असे शिस्तबद्ध पारंपरिक वाद्यात परतीच्या वाटेवर निघतात..
घरी येताना हातावर आणलेल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी डोक्यावरूनच घेऊन जातात, कारण त्याची प्राणप्रतिष्ठा झालेली असते आणि त्याच्या दैवीरूपामुळे तो भारदस्त झालेला असतो आणि तो माणसाच्या हातांना न पेलवणारा झालेला असतो. बाप्पा ज्या मार्गातून घरी आला त्या मार्गापेक्षा निरोपाचा मार्ग वेगळा असतो, कारण बाप्पाचं घरातलं वास्तव्य ह्या दहा दिवसारखं कायम रहावं हि त्यामागची भावना असते. सर्व गावातले बाप्पा पाटावर नदीकिनारी ठेवले जातात आणि गावासमोर बाप्पाला गार्हाणे मांडलं जातात. बाप्पाला गाऱ्हाण्यातून साऱ्या गावासमोर इच्छा व्यक्त केली जाते. हे साकडं साऱ्या गावासमोर मांडलं जात कारण त्या अडचणींसाठी किंवा इच्छेसाठी गावातूनच कोणीही धावून येत. गाऱ्हाणं हे एकांतात किंवा कुटुंबासमोर मांडलं तर त्याला महत्व नसत. नदीतीरावर बाप्पाची मनोभावे पुजा, आरती करून पाच वेळेस पाण्यात बुडवून बाप्पाला विसर्जित केलं जात. विसर्जनानंतर पाटावर नदीची वाळू आणली जाते आणि त्या पाटाची घरी आल्यावरही आरती केली जाते. पाटावरची वाळू घरात, शेतात आणि आजूबाजूच्या परिसरात टाकली जाते, ज्यातून बाप्पाचा सहवास दरवळत राहील अशी भावना असते.
निरोपाच्या दिवशी जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देताना डोळ्यातील अश्रुनी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" ह्या भावनिक विनवणीने मनाची समजूत काढली जाते.. सजवलेले मखर बाप्पाच्या जाण्याने आज सुने होतील, बाप्पाच्या जाण्याने आज डोळे पाणवतील... बाप्पा सर्वाना सुखी ठेवो हीच प्रार्थना.. "निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी, चुकले अमुचे काही त्याची क्षमा असावी"...
डॉ . प्रशांत शिरोडे..
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
उत्तर द्याहटवाJai ho ganpatti bappa ki ....
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाGanpati Bappa morya
उत्तर द्याहटवा